ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

गडचिरोली, दि. ८ जून २०२५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ उपक्रमांतर्गत आय.आर.सी.टी.सी. व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सुरु होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातून निवडण्यात आलेले ५० शिवप्रेमी, युवक, विद्यार्थी व इतिहास प्रेमी आज मुंबईकडे रवाना झाले. या गौरवशाली यात्रेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून ट्रॅव्हल्सद्वारे नागपूर व तेथून रेल्वेने मुंबईला रवाना करण्यात आले. येथून ते

या यात्रेचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण किल्ले आणि त्या परिसरातील धार्मिक स्थळांचे दर्शन घडविणे, त्यांच्या कार्याचे स्मरण आणि प्रेरणा घेणे असा आहे. राज्याच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ९ जून २०२५ रोजी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून पहिली विशेष ट्रेन सुटणार असून, ती शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातून या यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी जिल्ह्यातील युवकांना या ऐतिहासिक यात्रेमध्ये सहभागासाठी प्रेरित केले.

‘भारत गौरव यात्रा’ हा उपक्रम केवळ पर्यटन नसून शिवचरित्राच्या माध्यमातून प्रेरणा घेण्याचा, इतिहासाची जाणीव करून देण्याचा एक प्रयत्न आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिनिधींनीही या महत्त्वपूर्ण यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आज रवाना झाले.