ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘या’ विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना संकटात अनेक मुला-मुलींनी आपले पालक गमावले.. त्यात कित्येक मुले अनाथ झाले.. त्यामुळे या मुलांच्या राेजच्या जगण्याचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. अशा अनाथ मुला-मुलींसाठी राज्यातील शिंदे सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे..

कोरोना महामारीत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री पाटील यांनी ही घोषणा केली..

संपूर्ण शुल्क माफ

ते म्हणाले, की “कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी / पदव्युत्तरपर्यंत पूर्ण शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ केले असून, त्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची गरज नाही.”

कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले. त्यामुळे राज्यात अशी अनेक मुले-मुली अनाथ झाली आहेत. त्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्य सरकारने त्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईल त्यांची संपूर्ण फी राज्य सरकार भरेल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनाथ मुलांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबणार नाही.. राज्यातील अनाथ मुला-मुलींना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले..