ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

“नरेंद्र मोदी महान देशभक्त”, पुतीन यांच्याकडून पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक; म्हणाले “भारताचं उज्वल भविष्य…”

युक्रेनशी युद्ध सुरु असतानाच पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारत आणि रशियामध्ये चांगलं नातं असून, कोणत्याही मुद्द्यावरुन मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. मॉस्को येथील Valdai Club कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

“पंतप्रधान मोदी हे महान देशभक्त आहेत जे कोणत्याही गोष्टीला अटकाव करण्याचा किंवा काहीतरी मर्यादित करण्याचा प्रयत्न करूनही स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यास सक्षम आहेत.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त आहेत. काही गोष्टी मर्यादित करण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न होत असतानाही ते स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यास सक्षम आहेत. भारताकडे उज्वल भविष्य असल्याची तसंच जागतिक घडामोडींमध्ये वाढती भूमिका असेल याची मला खात्री आहे,” असं पुतीन म्हणाले आहेत.

पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ सांगणाऱ्या नरेंद्र मोदींचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार, म्हणाले “अखंडता…”

पुतीन यांनी यावेळी भारताच्या प्रगतीच्या प्रवासाचंही कौतुक केलं. “ब्रिटीश वसाहत ते एका स्वतंत्र देशापर्यंत भारताने फार मोठा पल्ला गाठला आहे. आमचे विशेष संबंध आहेत. आमच्यामध्ये कधीही कठीण समस्या निर्माण झाल्या नाहीत. आम्ही एकमेकांना पाठिंबा दिला असून, सध्याही तेच करत आहोत. भविष्यातही असंच होईल याची माल खात्री आहे,” असं पुतीन म्हणाले.

याआधी पुतीन यांनी अमेरिका आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांना लक्ष्य केलं. जागतिक नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्याकडून फार घाणेरडं, धोकादायक आणि रक्तरंजित राजकारण सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

“नाटोच्या फौजा रशियावर चालून आल्या तर जगभरात विध्वंस होईल”, व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर इशारा; सगळेच देश सतर्क!

रशियाने डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझ्झिया या चार युक्रेनियन प्रदेशांना विलीन केल्याच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रांच्या ठरावावर भारताने मतदान केलं नव्हतं. त्यानंतर पुतीन यांनी भारताच्या परराष्ट् धोरणाचं कौतुक केल्याचं दिसत आहे. भारताने इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे असून, त्यांना योग्य प्रकारे मांडलं जात नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान भारताने युक्रेनसोबत वाढत्या संघर्षावर चिंताही व्यक्त केली होती. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे आणि नागरिकांच्या मृत्यूचा मुद्दा भारताने मांडला होता.