गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

आता प्रत्येक नागरीकांना मिळणार आरोग्य संरक्षण कवच: डॉ ललित मल्लिक वैधकीय अधिक्षक मुलचेरा

मुलचेरा:-

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आता आरोग्य कवच प्राप्त होणार आहे.

जाणून घ्या कशी आहे हि योजना

राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना केंद्र व राज्य सरकार मिळून 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच प्राप्त होणार आहे.

म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रूपये मिळणार आहे याशिवाय आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गतही प्रती कुटूंब प्रती वर्ष 5 लक्ष रूपये मिळणार आहेत.

आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत.

यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात आले आहे, तर मागणी असलेले 328 उपचारांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या 147 ने वाढून 1356 एवढी झाली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत पण 1356 एवढे उपचार समाविष्ट करण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या 360 ने वाढविण्यात आली आहे. तर या 1356 उपचारांपैकी 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या 1000 आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांतील 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रूग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याव्यतिरिक्त 200 रूग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1350 होईल. यामध्ये सर्व शासकीय रुग्णालय अंगीकृत करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालये या योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.

याशिवाय मूत्रपिंड शस्त्रक्रीयेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रूग्ण 2.5 लक्ष एवढी आहे. ती आता 4.5 लक्ष रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या 14 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 करण्यात येणार आहे. तर उपचाराच्या खर्च मर्यादेत 30 हजार रूपयांवरून प्रति रूग्ण प्रती अपघात 1 लक्ष रूपये वाढ करण्यात आली आहे, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.