ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता OBC विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना, काय आहे योजना जाणून घ्या

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखीच योजना आणण्यात येणार आहे अशी घोषणा मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही आता ‘स्वाधार’ सारखी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृहे सुरू व्हावीत यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ती सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी विधानसभेत दिली. अडीच वर्षांत तुम्हाला वसतिगृहे का सुरू करता आली नाहीत असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. “OBC Swadhar Yojana Maharashtra 2023”

विधानसभेत विदर्भातील विकासाच्या प्रश्नांवर आणि इतर मुद्यांवर चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. फडणवीस पुढे म्हणाले की, 36 जिल्ह्यांतील 21 हजार 600 विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांच्या बँक खात्यात डिबीटीअंतर्गत जमा केला जाणार आहे. ओबीसी, मराठा विद्यार्थ्यांसोबतच आता आदिवासी विदयार्थ्यांना देखील फेलोशिपसाठी सरकार सहकार्य करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. ही वसतीगृह खासगी व्यक्तींना नव्हे तर ते स्वयंसेवी संस्थांना चालवायला दिले जाणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

  •  36 जिल्ह्यांतील 2 हजार 600 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
  • ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पाच वसतिगृहांची जागा निश्चित
  • ‘समृद्धी’च्या धर्तीवर नागपूर ते गोवा महामार्गाचे बांधकाम
  • नव्या वस्त्रोद्योग धोरणात विशेष पॅकेज
  • 6 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता
  • पैनगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाला तीन महिन्यांत परवानगी

विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचे अतिशय चांगले काम आम्ही केले, असा उल्लेख करताना फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेत केंद्र सरकारने मोठी मदत केल्याचा उल्लेख केला. सर्वाधिक प्रकल्प राज्याला मिळाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

सहा प्रकल्पांना ‘सुप्रमा’

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधित एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) देण्यात आली नव्हती. आम्ही 6 प्रकल्पांना सुप्रमा दिल्या असून 5 प्रकल्पांच्या सुप्रमांचे प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे असल्याचे त्यांनी सांगितले. कोर- घनाच्या काळात निदान सुप्रमा द्यायला काय अडचण होती? असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना केला.

मिहान प्रकल्पात 80 हजार रोजगार

नागपुरातील मिहान प्रकल्पात 49 प्रकल्पांना जमीन देण्यात आली आहे. आतापर्यंत सुरु झालेल्या प्रकल्पांमध्ये 80 हजार रोजगार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. योगगुरू रामदेवबाबा यांचा पतंजली प्रकल्प जानेवारीत सुरू होईल, गुंतवणूक कुठेही कमी होणार नाही असे सांगितले. नाना पटोले यांनी या प्रकल्पावरून प्रश्न उपस्थित केले होते.

70 हजार कोटींची गुंतवणूक

गेल्या 6 महिन्यात राज्यात जी 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली, त्यातील 44,000 कोटी रुपयांची गुंतवणूक विदर्भात आली आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. यातील मोठी गुंतवणूक ही नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

समृद्धीप्रमाणे आता नागपूर ते गोवा महामार्ग आपण बांधत आहोत. याचा सर्वात मोठा लाभ मराठवाड्याला मिळणार आहे. समृद्धी महामार्गापासून वंचित मराठवाड्यातील सारे जिल्हे यात जोडले जाणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने शेतीशी संबंधित अनेक कंपन्या स्थापन करण्यात येणार असून यासाठी 3 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. 5220 गावात नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना तयार केली असून 4 हजार कोटी रुपयांचा पहिला टप्पा झाल्यावर दुसऱ्या टप्प्यासाठी आता 6 हजार कोटी वर्ल्ड बँक देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (OBC Swadhar Yojana Maharashtra 2023)