गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

संतप्त Prakash Ambedkar काँग्रेसला खरमरीत पत्र

मुंबई :- गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर आगपाखड करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळेवर निमंत्रण दिल्याचे कारण समोर करीत प्रकाश आंबेडकरांनी बैठकीवर बहिष्कार घातला आणि एक खरमरीत पत्र लिहीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, असे वाटते की, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवारी पुण्यातील काँग्रेस भवनात पत्रपरिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले होते की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात.
तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की, काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. ठाकरे गटासोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले की, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खडगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आले नाहीत, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला.
पुढील बैठकीत आंबेडकर येतील
महाविकास आघाडीची पुढील बैठक 30 जानेवारी रोजी होणार असून, त्या बैठकीत प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील, अशी माहिती बैठक पार पडल्यानंतर मविआचे नेते संजय राऊत आणि नाना पटोले यांनी दिली. आंबेडकर यांनी भ‘मनध्वनीद्वारे दिल्लीतील नेत्यांशीदेखील चर्चा केली असून, ते आता पुढील बैठकीत सहभागी होण्यावर राजी झाले असल्याचे सांगण्यात आले.