ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद जिल्ह्याच्या कृषि, उद्योग

 महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ येथे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. जिल्हा समजून घेतांना विविध क्षेत्रात जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्ह्याचे कृषि, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, राजकारण या क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींशी मनमोकळी चर्चा करतांना त्यांच्या समस्या देखील समजून घेतल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय वन अधिकारी धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राज्यपालांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी शिक्षण, पर्यटन, उद्योग, वर्धा नांदेड रेल्वे मार्ग, जिल्ह्यातील विविध महामार्ग प्रकल्प, घरकुल योजना, विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आरोग्य विभागाच्या विविध योजना, जल जीवन मिशन, रोजगार हमी योजना, पेसा क्षेत्राच्या विकासासाठी केली जात असलेली कामे आदींची राज्यपालांनी माहिती घेतली.

आदिवासी कल्याणासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली पीएम जनमन योजना तसेच सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या ई- ऑफीस प्रणालीची अंमलबजावणी, सेवा हमी कायदा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देणारे सादरीकरण राज्यपालांसमोर सादर केले. यावेळी त्यांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजना उत्तमपणे राबविल्या गेल्या पाहिजे, असे सांगितले.

अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज्यपालांनी विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींशी संवाद साधला. कृषि क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी संवाद साधतांना त्यांनी जिल्ह्याचे कृषि क्षेत्र समजून घेतले. या क्षेत्राच्या विकासासाठी काय करता येईल, याची माहिती घेतली. उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधतांना जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाची माहिती जाणून घेतली. तसेच उद्योगाच्या क्षेत्रात जिल्ह्यात असलेल्या समस्या देखील जाणून घेतल्या.

आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला. आयुर्वेदाला चालणा देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी या क्षेत्रातील लोकांनी राज्यपालांसमोर मांडले. देशपातळीवर चमकलेल्या विविध क्रीडा प्रकारातील गुणवंत खेळाडूंशी संवाद साधतांना त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पत्रकारीतेच्या क्षेत्रातील काही लोकांशी संवाद साधतांना जिल्ह्यातील विविध प्रश्न समजून घेतले. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी देखील त्यांनी संवाद साधला.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत

यवतमाळ, दि.११ (जिमाका) : महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे शासकीय विश्राम भवन यवतमाळ येथे आगमण झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तत्पुर्वी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना मानवंदना देण्यात आली.