मुंबई, दि. २ : राज्य शासन शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शेती व शेतकऱ्यांचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. शेतीवर प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेतीचे मॅपिंग करून अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.
केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. बैठकीस कृषी आयुक्त सूरज मांढरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), संचालक विनयकुमार आवटे, उपसचिव प्रतिभा पाटील, कृषी सहसंचालक उदय देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शेतीची उत्पादक क्षमता आणि उत्पादन वाढविण्यासाठी जमीन सुपीकता अभियान प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी मदत व मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना पाणी, माती परीक्षण आणि जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे यासंदर्भात मार्गदर्शन करावे. अशा प्रकारचे अद्यावत मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी निर्यातक्षम पिकांकडे वळतील. यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून ते अधिक स्वावलंबी होतील. नावीन्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून अधिक उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा तयार करून त्या इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात तसेच या यशोगाथा सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध करून द्याव्यात, असेही कृषी राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना तांत्रिक मान्यता देण्यासाठीची एसओपी अधिक सुटसुटीत व सुसंगत असावी. जिल्हा नियोजन तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतही समन्वय ठेवणे आवश्यक आहे. अन्य विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी योजनांची माहिती कृषी विभागाकडे असावी, अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.





