ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जल पर्यटन प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक विकासासह स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोड्या पाण्यातील देशातील सर्वात मोठे कोयना जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक विकास आणि स्थानिकांना रोजगारास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जिल्ह्यातील मुनावळे  (ता. जावळी) येथे कोयना जलाशय (शिवसागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रीमती शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटनासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र, विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणपूरक असला पाहिजे. पाणी  प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, या भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता या बाबीही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  रोजीरोटीसाठी गावापासून आई-वडिलांपासून, कुटुंबापासून, तरुणांना दूर जावे लागते. त्यांना रोजगारासाठी गाव सोडून जावे लागू नये, उलट गाव सोडून गेलेले पुन्हा आपल्या घरी यावेत, त्यांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावेत हा आपला उद्देश आहे. विकासात्मक काम करणारे शासन असल्यामुळे राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. 1 लाख 37 हजार कोटीचे प्रकल्पांचे दावोस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. 3 लाख 93 हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत. 5 लाख कोटींची गुंतवणूक आपण राज्याच्या विकासासाठी आणली आहे. उद्योग वाढीसाठी उद्योगांना सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी जल पर्यटन प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावा, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, मुनावळे गावचे सातबारे खातेदारांच्या नावावर करून मिळावेत, अन्य उर्वरित रखडलेले प्रकल्पही मार्गी लावावेत, जलाशयात मासेमारी परवाने मिळावेत, अशा मागण्या केल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सरपंच श्री. भोसले,  विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.